मुंबई: राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आज वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या बैठका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे काल शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना काल रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. ‘मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,’ अशी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केली आहे.

शिवसेनेचे ५६ आमदार अधिक शिवसेनेला पाठिंबा देणारे आठ आमदार असे एकूण ६४ आमदार मातोश्रीहून रंगशारदा येथे गेले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत वांद्रे येथील या हॉटेलमध्ये हे सर्व आमदार थांबणार आहेत. दरम्यान, काळजीवाहू सरकारची मुदत संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने सत्तास्थापनेचा पेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना सोडवावाच लागणार आहे. त्यादृष्टीने आज हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, रात्री उशिरा युवासेना अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी रंगशारदा हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व शिवसेना आणि समर्थक अपक्ष आमदारांची हॉटेलमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट दिली आणि परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यानंतर आज नेमक्या कोणत्या घडामोडी घडणार ते पाहावं लागणार आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे सर्व आमदार जयपूरमध्ये वास्तव्य करणार असल्याचं वृत्त आहे. एकाबाजूला असं चित्र असल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक मजेशीर ट्विट शेर करत, “हा मेसेज करणाऱ्याला सलाम” असं देखील म्हटलं आहे.

काय आहे ते नेमकं ट्विट;

राष्ट्रवादीचे आमदार घरीच; कारण सगळ्यांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केला…बाकी सलाम त्या?