मुंबई: ‘क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक आहे. क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो. राजकारणात तसं होतंच असं नाही. भाजपचंही तेच झालं. त्यांना चेंडू दिसलाच नाही,’ असा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्युत्तर दिलं.

राज्यातील सत्तास्थापनेच्या घोळामध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तास्थापनेच्या नाट्यातून भारतीय जनता पक्ष बाहेर पडली आहे असं वाटत असताना नितीन गडकरींनी केलेल्या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मात्र गडकरी आमचे मित्र आहेत पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे, क्रिकेट मध्ये बॉल दिसत असतो पण भाजपला बॉल दिसला नाही असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

तत्पूर्वी, गुरूवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. ‘मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा बंद दाराआड अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली होती. ती बंद दाराची खोली खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यामुळे त्यांची ती खोली आम्हाला मंदिरापेक्षा कमी नाही. तिथे झालेली शहा-ठाकरे यांच्यातील चर्चा शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितली नाही, त्यामुळे गोष्टी बिघडल्या’, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी थेट अमित शहा यांच्यावर केला होता. त्यामुळे आशिष शेलार यांनी आज संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी सरकार स्थापनेसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणुका टाळण्याचा सर्वपक्षीयांचा प्रयत्न आहे. भाजपला वगळून सत्तास्थापन करण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं एकमत झालं असून किमान समान कार्यक्रमाची आखणी सुरू झाली आहे.

क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो, राजकारणात नाही; भाजपला चेंडू दिसलाच नाही: बाळासाहेब थोरात