मुंबई: येत्या २४ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता उद्धव ठाकरेंनी आपाला नियोजित अयोध्या दौरा रद्द केल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेच वाढल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा (Uddhav Thackeray on Ayodhya Tour) रद्द केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, अयोध्येमधील वादग्रस्त जमिनीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने ९ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक निकाल दिला. त्यावेळी ‘येत्या २४ नोव्हेंबर रोजी सर्व काही नियोजन व्यवस्थित झाल्यास मी स्वत: अयोध्येला जाईन’, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु, आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

गेल्या वर्षभरामध्ये राम मंदिराच्या (Ayodhya Ram Temple) मुद्द्यावर शिवसेनेने आक्रमाक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. राम मंदिर प्रश्नासंदर्भात शिवसेनेने वर्षभऱामध्ये अनेक कार्यक्रम घेतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे काही प्रमुख नेते याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये अयोध्येला गेले होते. शरयु नदीच्या किनारी त्यांनी महाआरतीही केली होती. याच दौऱ्याची जाहिरातबाजी करण्यासाठी पक्षाने राज्यामध्ये ‘पहले मंदिर फिर सरकार’ असे बॅनर्स लावले होते. लोकसभा निवडणुकीच्या काही महिनेआधीच शिवसेनेने राम मंदिर बांधण्यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. उद्धव यांच्या या दौऱ्याची देशभरात चर्चा झाली होती.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिना होत आला तरी अद्याप राज्यात नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. या निव़़डणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (Shivsena Party) महाय़ुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाल्याने शिवसेनेने भारतीय जनता पक्षाची साथ सोडली होती. परंतु राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात अद्याप अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी होण्यास उशीर होत आहे.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर