नागपूर: राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. भारतीय जनता पक्ष-सेना यांच्यात सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणातून अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी सांगितले की, लहान मुलांचे प्रथम गुरू त्यांचे आई-वडील असतात. शाळेत जाण्यापूर्वी त्यांना प्राथमिक शिक्षण घरातूनच मिळतं.

शिक्षणातूनच विकास, सुख आणि मुक्ती अपेक्षित आहे. प्रत्येकजण चांगला बनण्याचा विचार करतो. परंतु, माणसामध्ये अहंकार असतो. माणूस प्रत्येक गोष्टीवर त्याचे वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतो. तो कोणालाही काही देऊ इच्छित नाही. जरी दिले तरी कमीत कमी कसे देता य़ेईल हे पाहतो. ही हुशारी केवळ त्याच्याकडेच असल्याचे भागवत म्हणाले. पुढे भागवत म्हणाले की, आपापसात भांडून दोघांचेच नुकसान आहे हे माणसाला माहिती असते, तरीही ते वाद सोडत नाहीत. स्वार्थीपणामुळे नुकसान होते हे देखील माहिती असते, पण ते ही सोडत नाहीत. हे तत्व देश आणि लोकांसाठीही लागू होते.

“स्वार्थ अत्यंत वाईट गोष्ट आहे, हे सर्वांना माहित आहे. परंतु, आपल्या स्वार्थाला खूप कमीजण सोडतात. देशांचे उदाहरण घ्या किंवा व्यक्तींचे. माणसाला हे देखील माहिती आहे की निसर्गाला नष्ट केल्याने आपलाही विनाश होणार आहे. परंतु, निसर्गाला नष्ट करण्याचे कार्य अद्यापही थांबलेले नाही. आपसात भांडण केल्याने दोघांचेही नुकसान होते. तरीदेखील आपसातील भांडणं अद्यापही बंद झालेली नाहीत,” असं देखील सरसंघचालक मोहन भागवत यावेळी म्हणाले.

दरम्यान, मोहन भागवत यांनी हे सूचक विधान केले असले तरी देखील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत चर्चा सुरू होईल अशी परिस्थिती नाही. उलट राज्यात पुढील आठवड्यात सरकार स्थापन होईल अशी सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना या पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रम ठरला असून तिन्ही पक्षांची या कार्यक्रमावर जवळ-जवळ सहमती झालेली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. पहिल्या टर्ममध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेस पक्षाला विधानसभेचे अध्यक्षपद मिळेल अशी सूत्रांची माहिती आहे.

आपसातील भांडणांमुळे दोघांचे नुकसान झाले पण अजून भांडणं बंद नाहीत: मोहन भागवत