नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राज्यात निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी अडथळे येत असल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान महाशिवआघाडीचं सरकार स्थापण्यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत.

मात्र सरकार स्थापनेला थोडा विलंब होत असल्याने अवकाळी पावसामुळे रडकुंडीला आलेला शेतकरी सध्या प्रशासकीय पातळीवर मदत प्राप्त करण्यास त्यांना प्रचंड अडथळे येत आहेत. तसेच राज्यपालांनी जाहीर केलेली तातडीची मदत अत्यंत कमी असल्याने पवार स्वतः यामध्ये केंद्राकडे मदत मागणार आहेत. त्यानुषंगाने, राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे.

तत्पूर्वी राज्यसभेच्या अधिवेशनात झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीचे तोंडभरून कौतुक केले आणि मोदींच्या साखर पेरणीची सर्वत्र चर्चा रंगली होती. मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) आणि बिजू जनता दल (Biju Janata Dal) या दोन पक्षांचं कौतुक केलं. या दोन्ही पक्षांचे खासदार कधीच वेलमध्ये उतरत नाहीत. या दोन्ही दलांकडून आपण सर्वांनी धडा घ्यायला हवा. भारतीय जनता पक्षानं (Bharatiya Janata Party) देखील शिकायला हवं, असं मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल या दोन्ही पक्षांनी परस्परांमध्ये ठरवले होते की, कोणतेही मुद्दे असले तरी गोंधळ घालण्यासाठी वेलमध्ये जायचे नाही. असा गोंधळ त्यांनी घातला नाही तरीसुद्धा त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणताही अडथळा आला नाही. सभागृह हे संवादासाठी असले पाहिजे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वादविवाद झाले तरी अडथळ्यांऐवजी संवादाचा मार्ग निवडायला हवा.

स्थायित्व आणि विविधता ही राज्यसभेची (Rajyasabha) दोन वैशिष्ट्ये आहेत. लोकसभा विसर्जित होते, पण राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, तसेच ती होणारही नाही. येथे राज्यांचे प्रतिनिधित्व निश्चित होते. त्यामुळे येथे विविधता दिसून येते. तसेच निवडणूक प्रक्रियेतून सभागृहात येऊ न शकणाऱ्या गुणवान व्यक्तींना या सभागृहात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. त्यांचे गुण, अनुभव यांचा देशाला फायदा होतो.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यासह सरकार स्थापन करण्याचे काम सुरू असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. खासदार संजय राऊत यांनी काल सांगितले होते की, आठवडाभरात महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात युतीचे सरकार सत्तेत येईल.

शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ मोदींना भेटणार