नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजपला आमंत्रण देण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत रिट याचिका दाखल केली असून या याचिकेवर आज रात्रीच तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती तिन्ही पक्षांकडून करण्यात आली आहे. याचिकेत केंद्रीय गृहमंत्रालय, महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.

आता ही लढाई न्यायालयात पोहोचली आहे. दरम्यान यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुरु असलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे ४२ आमदार उपस्थित असल्याची माहिती एएनआयने दिले आहे. महाराष्ट्रातील हे राजकारण नेमके कुठल्या दिशेने जाणार ते लवकरच स्पष्ट होईल. अजित पवारांनी आज सकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन शरद पवारांना धक्का दिला. आता राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवारांसोबत दिसत असले तरी ३० नोव्हेंबरला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्यावेळी आमदार कोणाच्या बाजूने उभे राहतात ते महत्वाचे आहे.

मात्र भारतीय जनता पक्षाच्या या खेळीविरोधात महाविकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. यामध्ये काँग्रेस, शिवसेनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यपालांनी केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस किती वाजता केली? केंद्र सरकारने राष्ट्रपतींना राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस कधी केली? राष्ट्रपतींनी केंद्राची शिफारस कधी स्वीकारली? राज्यपालांनी कोणत्या पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना शपथविधीसाठी निमंत्रण दिलं? मुख्य न्यायाधिशांना शपथविधीला बोलवण्यात आलं नाही? शपथविधी किती वाजता झाली? माध्यमांना का बोलवण्यात आलं नाही? असे असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

शपथविधी विरोधातील शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सकाळी सुनावणी