मुंबई : “अरे हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आज नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेसवर टीका केली.
“या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारनेच पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझा समावेश असल्याचा आरोप केला होता. आता हिम्मत असेल तर मला अटक करुन दाखवा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले.
आपण या देशाचे नागरिक आहोत, हे सिद्ध करण्यासाठी सरकार आपल्याकडे कागदपत्रं मागणार आहे. आपल्या आजोबा-पणजोबांची माहिती मागितली जाणार आहे. इतकी जुनी माहिती आम्ही कुठून देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशात अराजकता माजवण्यासाठी एनआरसीचा घाट घातला जात आहे. देशातील काहींचा मताधिकार सरकारला काढून घ्यायचा आहे. त्यासाठी सरकारला त्यांचं नागरिकत्व रद्द करायचं आहे. यामुळेच सरकारला एनआरसी लागू करायचा आहे, असा आरोप त्यांनी केला.
आंबेडकर म्हणाले, “सरकारने आणलेली डिटेन्शन कँपची जी पद्धत आहे, ती ब्रिटिशांनी आणलेली पद्धत आहे. त्यावेळी त्यांनी जो गुन्हेगारी जमात कायदा केला यामध्ये ज्या जमातींना गुन्हेगार ठरवलं गेलं, त्या जमातींना डिटेन्शन कँपमध्ये ठेवण्यातं आलं होतं. या देशात ज्यांना शिक्षणाची दारं व्यवस्थेनं बंद केली होती, त्यांच्याकडे जमिनी नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या आलिकडच्या पिढीकडे कुठलीही कागदपत्रे नाहीत. एनआरसी या लोकांविरोधात असणार आहे. जर तुम्हाला या डिटेन्शन कँपमध्ये जायचं नसेल तर हे सरकार पाडा” असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं.
Web Title: Modi Government Trying to Create Chaos in the India Says Prakash Ambedkar.
