मुंबई: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात हिंसाचार घडवणाऱ्या बुरखाधाऱ्यांचे चेहरे समोर यायला हवेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. चेहरे लपवून हल्ले घडवणारे भेकड आहेत. त्यांच्यात इतकी हिंमत आहे तर मग ते तोंडावर मुखवटे लावून का फिरतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई होऊन हल्लेखोरांचे चेहरे देशासमोर यायला हवेत. हा संपूर्ण प्रकार कोणाच्या पाठिंब्यानं झाला ते पुढे कळेलच. त्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.

जेएनयूतील विद्यार्थ्यांवर रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तोंड लपवून हल्ला करणारे हे घाबरट आहेत. हल्ल्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर २६/११ दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव यांनी सांगितले.

तसेच तोंड लपवून हल्ला करणाऱ्यांचे चेहरे उघडे झाले आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्रातील तरूण-विद्यार्थी सुरक्षित असून त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा शब्दातही मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला.

 

Web Title: JNU attack faces attackers should come front public says Chief Minister Uddhav Thackeray.

JNU हल्ला: ही तर २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याची आठवण: उद्धव ठाकरे