मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता जाऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास स्थापन करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना वारंवार लक्ष होताना दिसत आहे. तसेच आघाडीचं सरकार असल्याने शिवसेना देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेस दुखावली जाणार नाहीत याची काळजी घेताना दिसत आहेत.

मात्र सर्व प्रकारात शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावरून शांत झाल्याची टीका सुरु झाली आहे, तसेच त्यांचा प्रवास आता ‘सेक्युलर’ होण्याच्या दिशेने सुरु असल्याचं अनेक राजकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. मात्र राज्यात आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहकार्याने सरकार स्थापन केल्याने अयोध्या दौरा बासनात गुंडाळण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे.

त्यामुळे हिंदुत्वाला मानणारा एक मोठा वर्ग शिवसेनेवर संतापल्याचं चित्र आहे. दुसरीकडे मनसेने आता हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत नव्या राजकारणाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे आणि त्याची घोषणा येत्या २३ तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाअधिवेशनात होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी त्या संदर्भात अप्रत्यक्ष संकेत दिल्याने वृत्तात तथ्य असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे.

दरम्यान त्याच दिवशी शिवसेनेनेही जल्लोष मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या जल्लोष मेळाव्याला ५० हजार लोक उपस्थित राहणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शिवेसना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शक्तिप्रदर्शनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. येत्या २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बीकेसी मैदानावर जंगी सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जल्लोष मेळावा असं या मेळाव्याला नाव देण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकाला बसविण्याचं वचन उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिलं होतं. ते वचन त्यांना पूर्ण केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं.

३ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. रात्री १० वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल, असं सांगतानाच हा कार्यक्रम म्हणजे जल्लोष आणि वचनपूर्तीचा सोहळा असेल, असं अनिल परब म्हणाले. हे आयोजित केलेलं शक्तिप्रदर्शन नसेल. शिवसेनेला शक्तिप्रदर्शन करण्याची कधीच गरज भासली नाही. शिवसेनेची शक्ती संपूर्ण देशाला माहीत आहे. उलट लोक या दिवसाची वाट पाहत होते. लाखोच्या संख्येने ते स्वत:हून या सोहळ्याला उपस्थित राहतील, असंही ते म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिवेशनाला आमच्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

 

Web Title:  Maharashtra Chief Minister Uddhav Thackerays felicitation ceremony and MNS party Mahaadhiveshan on the same day in Mumbai.

मनसेचं महाअधिवेशन आणि शिवसेनेचा जल्लोष मेळावा एकाच दिवशी