मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) पाठिंबा दर्शवला आहे की विरोध हे प्रोमोमध्ये स्पष्ट झालेलं नाही. तर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (NRC) विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपली भुमिका मांडली.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळं देशातील कोणत्याही नागरिकाचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही. मात्र, महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही. एनआरसी लागू झाल्यास हिंदू आणि मुस्लीम अशा दोघांनाही नागरिकत्व सिद्ध करण्यात खूपच अडचणी येऊ शकतात. मी असं होऊ देणार नाही, असंही ठाकरे म्हणाले.

दरम्यान, त्यांच्या याच विधानावर भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली. “हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, असा घणाघात शेलारांनी केला. आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतच्या भूमिकेवरही टीका केली. “शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल”, असे टीकास्त्र शेलारांनी सोडलं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपाऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ‘भारतीय विद्यार्थी चळवळ दशा आणि दिशा’ या विषयावर बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

या टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला असून आशीष शेलारांना हे वक्तव शोभत नाही. भाजपच्या हातातून सत्ता निसटल्याने भाजप अस्वस्थ आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आशीष शेलार जर बाप काढत असतील तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेत नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनी आशीष शेलार यांना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, मी कुणावरही वैयक्तीक टीका केली नाही, असे स्पष्टीकरण आशीष शेलार यांनी दिले आहे.

 

Web Title:  Minister Jitendra Awhad slams BJP MLA Ashish Shelar over criticising CM Uddhav Thackeray over CAA issue.

आम्ही गुजरात’मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही; आव्हाडांचं शेलारांना प्रतिउत्तर