मुंबई : आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागलेले असताना राज्यातील काँग्रेस मात्र अजून सुद्धा सुस्त असल्याचे स्पष्ट जाणवते. सध्या राज्यात काँग्रेस पक्षाला राज्य स्तरावरील चेहराच नसल्याने अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण हे दोन्ही नेते त्यांच्या मतदारसंघापुरतेच आवडते चेहरे आहेत. परंतु काँग्रेसमधला सुस्तपणा राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत अडचणीत टाकू शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात आणि पक्ष बांधणीमध्ये आघाडी घेतली असली तरी, काँग्रेसमधील सुस्तावले पणा राष्ट्रवादीला सुद्धा भोगावा लागू शकतो अशीच एकूण परिस्थिती आहे. नारायण राणेंच्या नंतर विरोधकांवर तुटून पडेल आणि प्रसार माध्यमांचे लक्ष केंद्रित करेल असा एकही नेता सध्या राज्यातील काँग्रेसकडे नाही. देशात इतर राज्यात काँग्रेस चांगल्याप्रकारे उभारी घेत असली तरी महाराष्ट्रात काँग्रेस आहे की नाही अशीच परिस्थिती आहे.
मुंबईमधील काँग्रेसमध्ये सुद्धा संजय निरुपम यांच्यामुळे दोन गट पडले आहेत. तसेच अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांची दखल माध्यमं सुद्धा जास्त घेत नसल्याने काँग्रेस पक्ष राजकीय प्रकाशझोतातून निघून गेल्याचे चित्र आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत तर काँग्रेसची अवस्था फारच बिकट असल्याचे समोर आलं.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या या बिकट स्थितीमुळे आगामी निवडणुकीत त्यांची ‘बार्गेनिंग पावर’ सुद्धा घटू शकते. राज्यातील राजकीय परस्थिती भाजपला पोषक नसून त्याचा फायदा उचलण्यास आणि राज्यभर सरकार विरोधात रान उठविण्यास काँग्रेस कमी पडत असल्याचे चित्र आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक मरगळ आल्याचे चित्र आहे.
प्रत्येक पक्षाकडे राज्य पातळीवरील एक दोन चेहरे आहेत, त्यामुळे पक्ष प्रसार माध्यमांपुढे प्रकाशझोतात राहत आहेत. परंतु काँग्रेसच्या बाबतीत मात्र राज्यात वेगळीच परिस्थिती असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भविष्यातील परिस्थिती काँग्रेसच्या बाजूने बदलली नाही तर त्याचे राजकीय परिणाम प्रत्यक्ष पणे काँग्रेस बरोबर राष्ट्रवादीलासुद्धा भोगावे लागू शकतात.
