पंढरपूर : ठाण्याचे विधानसभा आमदार एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त एकाही विधानसभेवरील आमदाराला पक्षप्रमुखांनी कॅबिनेट मंत्रिपद दिले नसून, केवळ जवळच्या लोकांनाच मंत्रिपद दिल्याने नाराज आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत मोठी पक्ष फुटी होऊन किमान १५ आमदार भाजप सोबत जातील आणि ते नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नाराज आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे.

आमदार प्रताप पाटील चिखलीकर काल आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात आले असता, शासकीय विश्रामगृहत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना सेनेतील नाराज आमदारांच्या विषयावर बोलते केले. शिवसेनेत तुमच्यासारखे अजुन किती नाराज आमदारांची संख्या आहे या प्रश्नाला उत्तर देताना चिखलीकर म्हणाले की, माझ्यासारखे किमान २० आमदार पक्ष नेतृत्वावर प्रचंड नाराज असून हा आकडा वाढू शकतो असं ते म्हणाले. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून सहा आमदार असून सुद्धा एकही आमदाराला मंत्रिपद देण्यात आले नाही. तसेच नांदेड मध्ये सुद्धा पक्षाचे ४ आमदार असून सुद्धा एकालाही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेले नाही.

पुढे चिखलीकर म्हणाले की, केवळ एकनाथ शिंदे हेच विधानसभेवर निवडून आलेले आमदार असून बाकी सर्व विधान परिषदेवरील जवळच्या लोकांना पक्षाने कॅबिनेट मंत्रिपद दिल्याने नाराज आमदारांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे ते सर्व आमदार भाजपच्या थेट संपर्कात असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत उभी फूट पाडण्याचं भाकीत सुद्धा त्यांनी चर्चेदरम्यान केलं. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेईल अशी शक्यता राजकीय विश्लेषक बोलून दाखवत आहे. त्यामुळे भाजपने सुद्धा छुप्या पद्धतीने आधीच फिल्डिंग लावल्याचे समजले जाते. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेने काही चुकीचे पाऊल उचलल्यास शिवसेनेत उभी फूट पाडण्याची योजना आखल्याचे चिखलीकरांच्या संवादातून स्पष्ट होत आहे.

shivsena party may split soon and minimum 15 to 20 can enter in bjp says shivsena mla chikhalikar