पुणे : मराठवाडा दौरा सुरु करण्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर केवळ खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून त्यामुळे अनेक प्रवाशांना जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यां आक्रमक पवित्रा घेत झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन छेडलं आहे.
गेल्या आठवडाभर मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरातील खड्ड्यांचा मुद्दा प्रचंड गाजतो आहे. त्याविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन करत थेट मंत्रालयाच्या प्रवेश द्वारावर खोदून टाकले आणि सरकारला खड्ड्यांच्या त्रासच गांभीर्य पटवून देण्याचा प्रयत्नं केला. परंतु त्यानंतर काही आंदोलकांना ताब्यात घेऊन काहींना थर्ड डिग्री देण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच त्या अधिकाऱ्याचे नाव सुद्धा त्यांनी सांगितलं. त्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा खटले दाखल केले जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे.
परंतु याच विषयाला धरून राज ठाकरे यांनी सरकारच्या या कृतीचा निषेध करत प्रति प्रश्न उपस्थित केला की,’उद्या भाजप सरकार गेल्यावर ते विरोधी पक्षात बसले तर त्यांच्या कार्यकर्त्यांना पट्ट्याने मारावे का? तसेच दूध आंदोलनावरही त्यांनी भाष्य करत थेट विधान केलं की राज्य सरकार हे केंद्र सरकार चालवतंय व त्यामुळे अमूलसारख्या गुजरातमधल्या कंपन्यांना महाराष्ट्रात मोकळं रान मिळावं, म्हणून सरकारचा हा सर्व घाट असल्याचा आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
