औरंगाबाद : समस्त मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी म्हणजे क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. त्यासंबंधित मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी लातूर येथे पार पडली असता हा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच कार्यकर्त्यांना राज्यभर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी म्हणजे ९ ऑगस्ट २०१६ रोजी औरंगाबादमधून मराठा क्रांती मूक मोर्चास राज्यभर सुरवात झाली होती. त्यामुळे या तारखेचे औचित्य साधून त्याच दिवशी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अली आहे.

औरंगाबाद मधील क्रांती चौकात रविवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा ठिय्या आंदोलन सुरूच होते. त्या ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. याआधी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सारख्या महत्वाच्या शहरांमध्ये सुद्धा विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच सोलापूर, मंगळवेढा, बार्शी, माढा, इंदापूर भागांत आंदोलनाला हिंसक वळण लागून एसटीवर दगडफेकीच्या घटना घडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक बंद करण्याची वेळ आली होती. त्यानंतर बीड – परळी तहसील कार्यालय परिसरात युवकांनी अर्धनग्न आंदोलन पुकारले होते.

मराठा समाजाचे आंदोलन सध्या आक्रमक होत चालले असून सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना या आक्रमक आंदोलना विषयी विचारले असता ते म्हणाले की,’राज्यभरात मराठा आंदोलनाची दिशा बदलली असून, याला राज्य सरकारच जबाबदार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या सरकारने न्यायालयात शपथपत्र दिले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. यापुढे दिवसेंदिवस चिघळणाऱ्या आंदोलनाला सरकारच जबाबदार राहील.

दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या पोलीस कारवाई संदर्भात आमदार नितेश राणे म्हणाले की,’पोलिसांनी उगाच मराठा समाजाचा तरूणांना नोटीस आणि केसेस टाकून त्रास देऊ नये..आम्ही अपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहोत..केस आणि नोटीस पाठवायचीच असेल तर पहिली केस माझ्यावर टाका..मी तयार आहे!!’.

Maharashtra band on 9 august by Maratha Samaj and MLA Nitesh Rane anger on police action over protestant of maratha samaj