मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना सत्तेत का सहभागी झाली यावर प्रतिक्रया दिली आहे. तसेच त्यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला आहे. भाजपवर कुरघोडी करण्याची एकही संधी शिवसेनेने मागील ४ वर्षांपासून सोडलेली नाही तरी शिवसेना सत्तेत सामील का झाली आहे असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला.

दरम्यान या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या निवडणुकीतील जनमताचा कौल ही जनतेची चूक नव्हती, तर जनतेची फसवणूक होती, अशी थेट टीका भाजपवर केली. खासदार संजय राऊत यांनी ‘२०१४ चा जनमताचा कौल ही जनतेची चूक होती असं वाटतं का आपल्याला? असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला.

त्यावर नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे या प्रश्नाला उत्तर देताना;

“नाही! असं नाही मी म्हणत… ती जनतेची फसवणूक होती. आणि मी म्हणून म्हणतो की, समजा त्या वेळी आम्ही सत्तेत सहभागी नसतो झालो, ज्या पद्धतीने आज भाजप राज्ये जिंकत चाललीय. वाट्टेल त्या पद्धतीने…जसे त्रिपुरामध्ये… काँग्रेस, तृणमूल पक्ष फोडूनच राज्य स्थापन केलं, तसं महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी वगैरे फोडून त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं असतं तर पुन्हा आम्ही बोंबलतच राहिलो असतो रस्त्यावर. त्याच्यापेक्षा मी माझ्या लोकांना कारभाराचा अनुभव घेऊ दिला”.

पुढे त्यांनी, गुजरातमध्ये ५००० शेतकऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. हेच का तुमचं विकासाचं मॉडेल, असा खडा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केलं. राजकारणात पैशांचा जोर वाढला आहे आणि हा पैसा नक्की कोठून येतोय हे कळले तर इतर राजकीय पक्षांनाही फायदा होईल, अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली.

shivsena chief uddhav thackeray interview with sanjay raut why shivsena is a part of maharashtra government