मुंबई : काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या तसेच एकूणच वाढलेल्या महागाईविरोधात आज भारत बंद पुकारला आहे. आज सकाळ पासूनच प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक तसेच बसेस अडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जवळपास देशभरातील एकूण ३१ पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला असला तरी महाराष्ट्रात मनसेने सक्रिय पाठिंबा दिल्याने राज्यात मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
परंतु, सत्तेत सहभागी असूनही नेहमी विरोधकांची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेनं मात्र बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला शिवसेनेनं पाठिंबा का दर्शवला नाही,असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. दरम्यान, शिवसेनेचे बंदमध्ये सहभागी न होण्याचे कारण समोर आलं आहे.
हाती आलेल्या वृत्तानुसार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे शिवसेना बॅकफुटवर गेल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर एक फोन गेला आणि सर्व सूत्र उलटी फिरू लागली आहे. विरोधकांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होऊ नका, अशी विनंती अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केल्याची माहिती मुंबई मिररने दिली आहे. त्यामुळे शिवसेना अखेर बॅकफुटवर गेल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर ही भविष्यातील युतीची नांदी असल्याचे राजकीय विश्लेषक मत व्यक्त करत आहेत.
