नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य विभागाने एका औषधामध्ये एकापेक्षा अधिक घटक वापरून तयार करण्यात येणाऱ्या तब्बल ३४३ औषधांवर कायमची बंदी घातली आहे. या औषधांना ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ म्हटले जाते आणि ते सामान्यांच्या आरोग्यास हानीकारक असल्याने या औषधांवर आता बंदी घातली गेली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे औषध निर्मितीतील तगड्या कंपन्यांना धक्का बसला आहे. तसेच तात्पुरता दिलासा मिळण्यासाठी सामान्य जी औषध वापरतात त्यात सॅरेडॉन अशी अनेक औषध सुद्धा या बंदीच्या कचाट्यात आली आहेत.
मागील अनेक वर्षांमध्ये प्रतिजैविकांचा प्रतिरोध सातत्याने वाढता दिसत होता. त्यात आसपासचे वाढते प्रदूषण, व्याधींचे बदलत जाणारे प्रकार तसेच त्यामुळे निर्माण होणारा प्रतिरोध हा रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक ठरत होते. त्याअनुषंगाने प्रतिजैविकांचा वाढता वापर वेळीच नियंत्रणात आणला नाही तर त्याचे मोठे दुष्परिणाम सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या प्रमाणात भोगावे लागतील याकडे सुद्धा अनेक वैद्यकीय तज्ज्ञ सातत्याने सरकारचे आणि संबंधित विभागाचे लक्ष वेधत होते.
