मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने धक्कादायक आरोप केला आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगताना तनुश्रीने एका मुलाखतीदरम्यान हा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
चित्रीकरणादरम्यानचा हा किस्सा सांगताना तनुश्री म्हणाली की, २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ सिनेमासाठी एका स्पेशल गाण्याचं चित्रीकरण त्यावेळी सुरू होतं. त्यादरम्यान नाना पाटेकर चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासूनच माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. दुसरं म्हणजे चित्रीकरणाच्या करारानुसार ते गाणं खरंतर केवळ माझ्या एकटीवर चित्रीत होणार असल्याचं अपेक्षित होतं. मी सर्व प्रकार दिग्दर्शक तसेच निर्मात्यांना सांगितला, परंतु त्यांनी सुद्धा मला नाना पाटेकर सांगतील तसं करण्यास सांगितलं होतं, असा धक्कादायक खुलासा तनुश्रीने एका मुलाखतीत केला आहे.
दरम्यान तनुश्रीने पुढे हे सुद्धा सांगितलं की, बॉलिवूडमधील अनेकांना नाना पाटेकर महिला कलाकारांशी असभ्य वर्तन करतात हे ठाऊक आहे. त्याव्यतिरिक्त त्यांनी महिला कलाकारांना सेटवर मारहाण केल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. परंतु यावर बोलायची कुणाची सुद्धा हिंमत होत नाही, असंही तनुश्री म्हणाली. इतकच नाही तर अभिनेते नाना पाटेकर यांनी गुंडांकरवी मला तसेच माझ्या कुटुंबियांना धमकावल्याच सुद्धा तनुश्रीने स्पष्ट केलं आहे.
