मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भर सभेत भाजपने लादलेली नोटबंदी ही म्हणजे देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. राज ठाकरेंच्या त्या आरोपाला सध्या माहितीच्या अधिकारात बाहेर आलेल्या आकड्यामुळे दुजोरा मिळताना दिसत आहे. कारण भारतात इतक्या सहकारी बँका असताना सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत सर्वाधिक म्हणजे ७४५. ५९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा नोटाबंदीनंतर अवघ्या ५ दिवसांमध्ये जमा झाल्याच माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे.
मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी माहिती अधिकाराअंतर्गत देशातील जिल्हा बँकेत नोटबंदी जाहीर केल्यानंतर जुन्या नोटासंदर्भातील माहिती आरटीआय कायद्याअंतर्गत मागवली होती. देशात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांकडून नोटाबंदी जाहीर करण्यात आली आणि १००० व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
नोटबंदी जाहीर केल्यानंतर ५ दिवसांनी देशभरातील जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. नेमक्या त्याच ५ दिवसांच्या काळात देशभरातील कोणत्या सहकारी बँकेत जुन्या नोटा स्वीकारण्यात आल्या होत्या तसेच त्याच जुन्या नोटांचा अधिकृत आकडेवारी मागविण्यात आली होती. कारण याच ५ दिवसांमध्ये जुन्या नोटा बदलून देण्यात आल्या होत्या.
माहितीच्या अधिकारात हाती आलेल्या आकडेवारीनुसार गुजरातमधील दोन बँक अग्रस्थानी असल्याचे समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा बँकेने सर्वाधिक जुन्या नोटा जमा केल्याचे आकडेवारीत समोर आले आहे. अहमदाबाद जिल्हा बँकेत त्या ५ दिवसात तब्बल ७४५. ५९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या. अहमदाबाद जिल्हा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर तशी अधिकृत माहिती उपलब्ध आहे. विशेष म्हणजे अमित शहा हे २००० साली अहमदाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सुद्धा होते. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो गुजरातमधीलच राजकोट जिल्हा सहकारी बँकेचा कारण या बँकेत ६९३ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या.
एकूणच समोर आलेली अधिकृत आकडेवारी पाहता आणि त्याचा थेट संबंध अमित शहा यांच्याशी आल्याने तसेच देशभरात व महाराष्ट्रात अनेक मोठमोठ्या सहकारी बँका असताना सुद्धा गुजरातमधील अहमदाबाद जिल्हा बँक आणि राजकोट जिल्हा सहकारी बँकांची नावं समोर आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले आरोपात प्रथमदर्शनी तथ्य तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
