नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. CJI रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पीठ बुधवारी अयोध्या प्रकरणात ‘मध्यस्थता’ व्हावी किंवा नाही याबद्दल निर्णय घेणार आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी गेल्या सुनावणीत मध्यस्थीचा पुन्हा प्रयत्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. याप्रकरणी चर्चा करून कोर्टाबाहेर तंटा सुटण्याची अवघा एक टक्का शक्यता असेल तरी ती शक्यता पडताळली पाहिजे, असं मत गेल्या सुनावणीत कोर्टात व्यक्त केलं होतं.
मुस्लिम समाजाच्या पक्षकारांनी यावेळी मध्यस्थीच्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकते, अशी भूमिका मांडली होती. दुसरीकडे रामलल्लाचे वकील मात्र अशा कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थीला तयार नव्हते. याआधी असे प्रयत्न झाले असून ते अयशस्वी झाल्याचं निर्मोही वकिलांनी म्हटलंय. आज न्यायालयानं दोन्ही पक्षकारांना याविषयीची भूमिका मांडण्यास सांगितलं आहे. त्यानंतर लगेचच सरन्यायाधीश गोगोईंच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय खंडपीठ मध्यस्थीच्या प्रयत्नांवर आपला निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.
मध्यस्थीनं प्रश्न सोडवण्याच्या प्रस्तावावर आज घटनापीठ अंतिम निर्णय देणार आहे. ‘मध्यस्थते’ची प्रक्रिया गोपनीय राहील तसंच भूमि वादाच्या सुनावणीच्या समांतररित्या हा वाद सामोपचारानं आणि सामंजस्यानं सोडवला जाऊ शकतो, असं जस्टिस बोबडे यांनी म्हटलं होतं.
