मुंबई : सध्या महागाईने हैराण झालेल्या सामान्य माणसाच्या ताटातील भाकरी सुद्धा महागली आहे. उत्पादनात घट झाल्याने मुंबईत ज्वारी आणि बाजरीचे दर दाम दुप्पट झाले आहेत. तसेच खानावळीत सुद्धा तयार भाकरीच्या दरात जवळपास ४ ते ५ रुपयांची वाढ झाल्याने मुंबईकरांच्या खिशाला भगदाड पडणार आहे.
याआधी चांगल्या प्रतीच्या ज्वारीचे दर बावीस ते पंचवीस रुपये प्रति किलो इतके होते. परंतु हेच दर आता ४८ ते ५० रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहेत. दरम्यान, बाजरीच्या दरांत प्रति किलोमागे १८ रुपयांवरून थेट २६ ते ३० रुपयांपर्यंत इतकी मोठी वाढ झाल्याने सामान्य लोकं हैराण झाले आहेत.
त्यात आधीच राज्यात दुष्काळ असल्याने परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे आणि त्याचा फटका ज्वारी-बाजरीसारख्या पिकांना सुद्धा बसणार असं कृषी तज्ज्ञांना वाटतं आहे. कारण पुरेशा पाण्याअभावी येथे पिके घेणे शक्य होत नाही. त्यात रानडुकरांच्या सुळसुळाटामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ लागल्याचे समोर येते आहे. दुष्काळामुळे २ वर्षांपूर्वी दरवर्षी घेतलं जाणार हे पीक आता केवळ पीक राहावे, म्ह्णून लावले जाते, असे उत्पादक शेतकरी खेदाने सांगतात.
त्यात बाजरीच्या तुलनेत ज्वारीला पाणी जास्त लागते. सोलापूर, लातूर आणि विदर्भामध्ये ज्वारी-बाजरी हे पीक घेतलं जातं. परंतु वरुणराजाने साथ न दिल्याने थेट पिकांच्या एकूण उत्पन्नावर परिणाम झाला आहे. धक्कादायक म्हणजे अनेक भागात केवळ जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी ज्वारीची लागवड केली जाते, असे अनेक शेतकरी सांगतात. त्यात सरकारची कृषी विषयक धोरणं सुद्धा मारक ठरत आहेत.
