नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारताची अर्थव्यवस्था एक व्यक्ती स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालवू शकत नाही. भारतीय अर्थव्यवस्था आता खूप मोठी झाली आहे. एका व्यक्तीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अर्थव्यवस्थेचं उदाहरण आपण पाहतोच आहोत, अशी टीकाही रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर केली आहे. रघुराम राजन यांनी यापूर्वीही मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरून टीका केली आहे. वित्तीय तूट वाढल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागतो. ब्राऊन विश्वविद्यालयातील एका व्याख्यानादरम्यान राजन म्हणाले, अर्थव्यवस्थेसाठी मोदी सरकारकडून काही ठोस पावलं न उचलल्यामुळे ती सुस्तावलेली आहे.
ते म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्थेच्या गंभीर संकटाचे कारण म्हणजे अर्थव्यवस्थेकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात असणारी अनिश्चितता. त्यात ‘मागील अनेक वर्षे उत्तम कामगिरी करून भारतीय अर्थव्यवस्थेने सध्या लक्षणीय पातळी गाठली आहे. २०१६ च्या पहिल्या तिमाहीत विकास दर ९% होता. राजन म्हणाले, ‘भारतासमोरील आर्थिक संकट एक लक्षण म्हणून पाहिले गेले पाहिजे मूळ कारण म्हणून नव्हे.’ विकास दरातील घसरणीसाठी त्यांनी गुंतवणूक, खप आणि निर्यातीतील सुस्ती तसेच एनबीएफसी क्षेत्रातील संकटाला जबाबदार धरले.
आर्थिक मंदीसाठी नोटबंदी आणि नंतर घाईत लागू केलेला जीएसटी जबाबदार असल्याचे राजन यांनी सांगितले. हे दोन निर्णय झाले नसते तर अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत राहिली असती. सरकारने कोणाच्याही सल्ल्याशिवाय नोटबंदी लागू केली. लोकांचं नोटबंदीमुळे नुकसान झालंच, शिवाय यामुळे फारसं काही हातीही लागलं नाही.
