भुवनेश्वर : ओडिशात फनी या चक्रीवादळाने मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान या चक्रीवादळात आतापर्यंत एकूण ६४ पेक्षा अधिक सामान्य स्थानिक नागरिकांचा जीव गेल्याचे वृत्त आहे. ओडिशातील पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून आजूबाजूच्या घरांची मोठी हानी झाली होती. घरे, रस्त्यावरील वाहने व झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या. पुरी शहरातील बराच भाग पाण्याखाली गेला होता. मोठ्या प्रमाणात ओडिशाचे नुकसान झाले. फनी या चक्रीवादळामुळे तब्बल ९३३६ कोटी एवढं प्रचंड नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
स्पेशल रिलीफ कमिशनर (एसआरसी) ने दिलेल्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळादरम्यान ६६४३.६३ कोटींच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच वादळामुळे नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी जवळपास २६९२.६३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक मालमत्तेची नुकसान भरपाई आणि इतर कार्यासाठी तब्बल ९३३६ कोटींची आवश्यकता आहे. त्यामुळे ओडिशा सरकारने हा खर्च पूर्ण करण्यासाठी एनडीआरएफकडे ५२२७.६८ कोटींची मागणी केली आहे.
Odisha incurred loss of over Rs 9,000cr due to Cyclone Fani
Read @ANI Story | https://t.co/vrmRdI2TxQ pic.twitter.com/3cxn6pBFen
— ANI Digital (@ani_digital) June 7, 2019
फनी चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा मोठ्याप्रमाणावर खंडीत करण्यात आला होता तो अजूनही सुरळीत सुरू झालेला नाही. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून ओडिशा राज्याला १,००० कोटींची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली होती. त्याचसोबत मृतकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्याचं आश्वासनही दिलं होतं. तर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी फनी चक्रीवादळामुळे ज्या लोकांची घरं उद्धवस्त झाली आहेत अशा लोकांना पक्की घरे देण्याची घोषणा केली आहे.
