नवी दिल्ली : देशातील आणखी एक दिग्गज कंपनी कर्जाच्या प्रचंड बोजाखाली आली आहे. त्यामुळे कोट्यवधींचे आर्थिक संकट कंपीनीच्या डोक्यावर कोसळले आहे. एस्सेल उद्योग समुहाच्या ‘झी’ टीव्ही, डिश टीव्ही आणि एस्सेल प्रीपेड या कंपन्यांचे शेअरचे भाव बाजारात अक्षरशः जमिनीला टेकले आहेत. त्यामुळे कंपनीच्या कामगिरीवर मोठा नकारात्मक परिणाम झाल्याने ‘झी’चे मालक सुभाष चंद्रा यांनी थेट आर्थिक मदत करणार्यांची जाहीर पत्राद्वारे माफी मागण्याची वेळ आली आहे.
सुभाष चंद्रा यांनी सार्वजनिक केलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्वप्रथम मी माझ्या आर्थिक मदतदात्यांची जाहीरपणे क्षमा मागतो. मी नेहमीच स्वतःच माझ्या चुका स्वीकारण्यासाठी पुढे राहिलो आहे. तसेच तुमच्या निर्णयांचे उत्तर सुद्धा शोधण्याचा प्रयत्न सातत्याने करत राहिलो आहे. आणि आज सुद्धा तेच करणार आहे. ५२ वर्षाच्या कारकिर्दीत प्रथमच मी आर्थिक मदत करणार्या संस्था, बँका, म्युच्युअल फंड आदींची जाहीर मी माफी मागण्यासाठी मजबूर झालो आहे. कारण मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. मी जे नवीन व्यवसाय सुरू केले त्यामध्ये प्रचंड आर्थिक नुकसान झाले. त्यात अजून आईएल अॅण्ड एफएसचा मुद्दा समोर आल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली. परंतु, कोणी सुद्धा आपले कर्ज फेडण्यासाठी स्वतःच्या मुकुटातील हिरा नाही विकत. दरम्यान, कर्ज फेडण्याची प्रक्रिया सुरू असताना काही नकारात्मक आणि अदृश्य हात ते होऊ न देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. याबाबत मी महाराष्ट्र पोलिसांत तक्रार सुद्धा दाखल केली, परंतु त्याची देखील दखल घेण्यात आली नाही. हे नकारात्मक अदृश्य हात संबंधित बँकांना पत्र लिहितात आणि त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक देवाण-घेवाणीवर होतो. आज झी इंटरटेन्मेंटला विकण्याची प्रक्रिया सकारात्मकतेच्या दिशेने पुढे सरकत आहे. मी लंडनवरून नुकताच भारतात परतलो आहे. परंतु, नकारात्मक अदृश्य हातांमुळे काहींनी आमच्या बाजारातील शेअरच्या किमतींवर हल्ला केला. एकाच दिवशी एस्सेल ग्रुपचे शेअर तब्बल १८ ते २१ टक्क्यांनी खाली कोसळले. त्यानंतर गुंतवणुकदारांनी स्वतःचे १४,००० कोटी रुपये काढून घेतले. परंतु मी माझी शिक्षा भोगण्यास पात्र आहे. तसेच मी कोणालाही फसवणार नाही. सर्वांची देणी देऊन टाकणार असल्याचे डॉ. सुभाष चंद्रा यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.
