BJP NCP Politics | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या शक्तिप्रदर्शन आणि सर्वसाधारण सभेनंतर आता ही लढाई निवडणूक आयोगाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पक्षाच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. त्यामुळे पक्षाचे नाव व चिन्ह त्यांच्या गटाला देण्यात यावे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 40 आमदार, विधान परिषद सदस्य आणि खासदारांच्या पाठिंब्याचा दावा केला आहे.
एकाबाजूला प्रचंड महागाई आणि बेरोजगारीची सामान्य जनता त्रासलेली असताना त्याच जनतेने निवडून दिलेले आमदार मात्र शाही थाटात आयुष्य जगत आहेत. या फुटीरवादी आमदारांना सामान्य जनतेची काहीच पडलेली असून ते केवळ स्वतःच्या राजकीय सौदेबाजीत बुडाल्याची टीका समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.
दरम्यान, अजित पवार गटाच्या सर्व आमदारांना मुंबईतील एका हायप्रोफाईल पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तत्पूर्वी, त्यांची स्वाक्षरी असलेली प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, सत्ताधारी आघाडीत उपमुख्यमंत्री होण्यापूर्वीच ३० जून रोजी अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी कोणताही आदेश देण्यापूर्वी आपली बाजूही ऐकून घ्यावी, अशी मागणी करणारी कॅव्हेट याचिकाही शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. अजित पवार यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ काही आमदारांची प्रतिज्ञापत्रेही आयोगाला दिली आहेत. दुसरीकडे शरद पवार यांनी महाराष्ट्रातील समर्थकांना पक्षाचे चिन्ह आमच्यासोबत असल्याचे सांगितले.
बुधवारी मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही गटांनी बोलावलेल्या बैठकीत ३२ आमदार अजित पवारांच्या समर्थनार्थ आले, तर शरद पवारयांच्या सभेला १४ आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादीकडे एकूण ५३ आमदार आहेत. नंबर गेममध्ये मागे पडल्यानंतर शरद पवार यांनी नवी दिल्लीत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली असून, त्यात राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार आहेत.
अजित पवार गट एनडीएत सामील झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेच्या आमदारांमध्येही कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आणि काल संध्याकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पक्षाची तातडीची बैठक बोलावली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसशी कधीच जोडले जाऊ शकले नसते, असे सांगत आमदारांनी युतीला आक्षेप घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
News Title : BJP NCP Politics Ajit Pawar Camp MLA staying in Mumbai 5 Star Hotel check details on 06 July 2023.
