पणजी : गोव्यात काँग्रेसच्या तब्बल १० आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यावरुन राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा आमदार उत्पल पर्रीकर यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर पक्षाने पक्षविस्तारासाठी भलताच मार्ग स्विकारला असल्याची बोचरी टीका केली आहे. भारतीय जनता पक्षातून आता विश्वास आणि वचनबद्धता असे शब्द संपले आहेत अशी थेट टीका उत्पल पर्रीकर यांनी काँग्रेस आमदारांच्या फोडाफोडीवरून केली आहे.

पीटीआयशी बोलताना उत्पल पर्रीकर यांनी म्हटलं आहे की, “माझे वडील हयात असताना पक्षात विश्वास आणि वचनबद्धता सारख्या शब्दांना प्रचंड महत्त्व होतं. कारण तीच पक्षाची मुल्यं होती. मात्र १७ मार्चनंतर दोन्ही शब्द पक्षातून कायमचे गायब झाले आहेत. १७ मार्चनंतर पक्षाने भलतीच दिशा पकडली आहे. आता काय योग्य आहे हे वेळच सांगेल ?”. १७ मार्च रोजी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मनोहर पर्रीकर यांचं निधन झालं.

गोवा विधानसभेत राष्ट्रीय एकूण काँग्रेसचे १५ आमदार आहेत. यामधील दहा आमदार बुधवारी भारतीय जनता पक्षात सहभागी झाले. त्यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्षांना आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. काँग्रेसचे दहा आमदार सहभागी झाल्यानंतर ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ आता २७ झाले आहे. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, “काँग्रेसचे दहा आमदार भारतीय जनता पक्षात सहभागी झाले आहेत. गोवा राज्याचा विकास करण्यासाठी त्यांनी हे महत्वाचं पाऊल उचललं आहे. त्यामुळे यासाठी त्यांनी कोणतीही पूर्व अट भाजपवर ठेवली नाही असं प्रसार माध्यमांना सांगितलं.

भाजप पक्षात आता विश्वास व वचनबद्धता सारखे शब्द संपले आहेत: उत्पल पर्रीकर