शिमला : हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमल्यात काही दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशात २०७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर राजधानी शिमल्यात ४७.७ मी.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
सिरमौर जिल्ह्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे पाणी साचत असून आणि अधिक भर म्हणजे भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उद्याही तुफान पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे हिमाचल प्रदेशातील शिमलामध्ये ५१ रस्ते तर मंडीमध्ये २२ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३०५ पूर्णपणे ठप्प झाले आहे. आतापर्यंत संपूर्ण राज्यात १४५ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे सतलज, ब्रम्हगंगा व पार्वती नदीला पूर आल्याने स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
