मुंबई : काल साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल खळबळजनक विधान केले होते आणि देशात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडून साध्वींच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. दरम्यान, सामान्यांपासून ते विरोधी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटताच साध्वी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असून ते माझे वैयक्तिक मत असल्याचीही कबुली दिली आहे आणि भाजपने देखील प्रकरण अंगलट येईल म्हणून सदर विषयावर हात वर केले आहेत. दरम्यान, भाजप आता विषयाला बगल देण्यासाठी मोदी करकरेंच्या कुटुंबियांना भेटले होते असा खोटा कांगावा करत आहे.
आज जरी कविता करकरे यांचं निधन होऊन अनेक वर्ष झाली असली तरी त्यावेळी कविता करकरे यांनी कोणत्याही राजकीय व्यक्तींची भेट घेण्यास स्पष्ट नकार दिला होता (अधिक माहिती). दरम्यान नोव्हेंबर २००९ मध्ये कविता करकरे आणि स्मिता साळसकर यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती आणि माध्यमांना सविस्तर माहिती देखील दिली होती (अधिक माहिती).
दरम्यान, २००८ मध्ये मुंबईवर हल्ला झाला तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते मुंबईत आले आणि शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांसाठी त्यांनी गुजरात सरकारतर्फे एक कोटी रुपयांचे साह्य़ जाहीर केले. मात्र त्यावेळी शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी ते साह्य़ घेण्यास स्पष्ट नकार दिला होता हे सांगण्याचं भाजप धाडस करताना दिसत नाही.
केवळ २७ जानेवारी २०१४ रोजी हेमंत करकरे यांची पत्नी कविता करकरे यांची मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्समध्ये ‘ए मेरे वतन के लोगो’ या देशभक्तीवरील गाण्याला ५१ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांच्यासोबत भेट झाली होती आणि त्यादरम्यान त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
दरम्यान काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी प्रज्ञा सिंग यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचं प्रतिक असून काँग्रेसला ते अत्यंत महागात पडेल, असे धक्कादायक उत्तर मोदींनी दिलं आहे. सदर विषय पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.
