नवी दिल्ली : सध्या देशात गोरक्षक आणि मॉब लिंचिंगवरून रणकंदन माजलं असताना आरएसएस प्रमुखांच्या एका विधानामुळे पुन्हा रान उठण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मॉब लिंचिंगचा गंभीर विषय आणि भारतात या घटनांनी घेतलेलं उग्र रूप आणि त्याचे दुष्परिणाम याची चर्चा थेट अमेरिकेच्या संसदेत आणि संयुक्त राष्ट्राच्या मंचावर घडली होती. तसेच त्यावर उपाययोजना करण्याची विनंती भारत सरकारला करण्यात आली होती.
देशातील हिंदी भाषिक पट्यात गोरक्षा आणि मॉब लिंचिंगवरून मोठं रान उठल्याचं अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून त्याचं लोन थेट महाराष्ट्रात देखील आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र यावरून दुसरीच शंका व्यक्त केली आहे.
गोरक्षेच्या नावावर देशात ठिकठिकाणी होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटना या हिंदू धर्म आणि संस्कृतीला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे असा थेट आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. अखिल भारतीय सामाजिक सद्भाव समितीकडून आयोजिक केलेल्या २ दिवसीय बैठकीत ते उपस्थितांना संबोधीत करत होते, त्यावेळी त्यांनी हे धक्कादायक विधान केलं.
यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, देशभरात हिंदू धर्माला आणि संस्कृतीला बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र रचलं जात आहे. मॉब लिंचिंगच्या नावाखाली समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम सुरु आहे. गोरक्षेच्या नावाखाली अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना होत आहेत. काही राज्यात तर एक योजनेद्वारे धर्म परिवर्तन केलं जात आहे. देशात आज जी परिस्थिती आहे ती पाहता संघाच्या सर्व प्रचारकांनी सतर्क राहणं गरजेचे आहे असं म्हटलं आहे.
