नवी दिल्ली: गुप्तचर विभागाने (आयबी) ईदनिमित्त हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. सोमवारी बकरी ईदच्या निमित्ताने इस्लामिक स्टेट आणि आयएसआयचा पाठिंबा असलेले दहशतवादी हल्ला करू शकतात, असा अलर्ट आयबीने जारी केला आहे. त्यामुळे दिल्लीसह अनेक महत्त्वाच्या शहरातील एअरपोर्ट, रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पोलीस दलातील सूत्रांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जैशच्या सात दहशतवाद्यांनी बनिहालच्या दक्षिण आणि पीर पंजालच्या पर्वतील भागातून घुसखोरी केली आहे. सध्या हे दहशतवादी राजौरी किंवा पूँछमध्ये लपले असावेत, अशी शक्यता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं व्यक्त केली. ‘सात दहशतवादी अनंतनाग हायवे आणि त्याच्या आसपासच्या भागात हल्ले घडवू शकतात. त्यांच्याकडून नागरी वस्त्या आणि सुरक्षा दलांची कार्यालयं लक्ष्य केली जाऊ शकतात,’ असा अंदाज दक्षिण काश्मीर दलातील सूत्रांनी वर्तवला.
मुंबई-दिल्लीसह देशातील १५ मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशातील महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुढील आठवड्यात दोन मोठे सण असून त्यादरम्यान दहशतवादी भारतात हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांनी सतर्क रहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
