बेंगळुरू: महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का देत शिवसेनेने काँग्रेस आणि एनसीपी’ला सोबत घेऊन सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील या राजकीय उलथापालथीवर अनेक मतप्रवाह पाहायला मिळत असताना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे व काँग्रेसलाही महत्त्वाचा असा सल्ला दिला आहे.

“जर काँग्रेसने शिवसेनेला समर्थन दिलं तर त्यांनी पाच वर्ष पाठिंबा कायम ठेवला पाहिजे. त्यानंतर लोकांचा काँग्रेसवर विश्वास बसेल,” असं मत एच डी देवेगौडा यांनी व्यक्त केलं आहे. तसंच पुढे बोलताना त्यांनी बाळासाहेबांनीच भारतीय जनता पक्षा’ला महाराष्ट्रात स्थान निर्माण करुन दिलं असल्याची आठवण करुन दिली.

“बाळासाहेबांनीच भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्थान दिलं. अडवाणी आणि वाजपेयींनी बाळासाहेबांच्या निवासस्थानी जाऊन जागा देण्यासाठी विनंती केली होती. भारतीय जनता पक्षाला याचा विसर पडला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे भारतीय जनता पक्षाला खाली खेचण्याची संधी आहे,” असं एच डी देवेगौडा यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेबांनीच भाजपाला महाराष्ट्रात स्थान दिलं: माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा