नवी दिल्ली : भारतीय किसान युनिअनची हरिद्वारहून निघालेली ‘किसान क्रांती पदयात्रा’ नवी दिल्लीतील किसान घाट येथे समाप्त करण्यात आली. काल रात्री उशिरा पोलिसांनी शेतकऱ्यांना किसान घाटावर जाण्याची अधिकृत अनुमती दिली. मात्र, केंद्र सरकार शेतकरीविरोधी असून मागण्या पूर्ण झालेल्या नसल्याचा आरोप करत शेतकरी निराश होऊन परतण्यास सुरुवात झाली आहे. आपण हे आंदोलन आता मागे घेत आहोत आणि त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी पुन्हा आपापल्या घरी परतावे, असे आवाहन शेतकरी नेते टिकैत यांनी केले.
या किसान क्रांती यात्रेला दिल्ली-युपीच्या सीमेवर हिंसक वळण लागले. त्यात आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी युपी आणि दिल्लीच्या पोलिसांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. शेवटी मंगळवारी रात्री उशिरा सुमारे १२.३० वाजता पोलिसांनी बॅरिकेड्स बाजूला केले आणि आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यास परवानगी दिली गेली.
किसान क्रांती यात्रेचे प्रतिनिधी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यादरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा सुद्धा झाली. त्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बीकेयू प्रमुख नरेश टिकैट यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यानंतर अखेर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा जाहीर केली. दरम्यान किसान घाट येथे फुले वाहून आम्ही आमचे आंदोलन मागे घेतले आहे आणि हे सरकार शेतकरीविरोधी आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत, असा आरोप मोदी सरकारवर केला.
