नवी दिल्ली: राज्यातील सत्तास्थापन करण्याबद्दल मुंबई अनेक बैठक झाल्या असल्या तरी सगळ्यांच्या नजरा दिल्लीकडे लागल्या आहेत. एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज चार वाजता बैठक होणार आहे. त्याआधीच शरद पवार यांनी सत्तास्थापन करण्यावरून सगळ्यांना बुचकळ्यात टाकणारी गुगली टाकली आहे. “सत्तास्थापनेबद्दल शिवसेना-भारतीय जनता पक्षानं बघावं,” असं पवार यांनी म्हटलं आहे.

पत्रकारांनी शिवसेनेसोबत मिळून महाराष्ट्रात कधी सरकार बनवता आहात, असे विचारले असता पवार म्हणाले, महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल शिवसेना-भारतीय जनता पक्षाला विचारा, शिवसेना-भारतीय जनता पक्ष वेगळे पक्ष आहेत, तसेच आमचे पक्षही वेगळ्या विचारधारेचे आहेत. “काँग्रेस-एनसीपी’ची आघाडी स्वतंत्र लढली आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती स्वतंत्र लढले. आता शिवसेनेला ठरवायचं आहे कोणासोबत जायचं आहे. संध्याकाळी सोनिया गांधी यांना भेटणार असल्याचंही पवारांनी सांगितलं आहे. तसेच एनसीपी – काँग्रेससोबत सरकार बनवणार आहे, असं शिवसेना म्हणत असल्याचं त्यांना विचारल्यावर त्यांनी उपरोधिका प्रतिसाद दिला.

तसेच पत्रकार वारंवार एकंच प्रश्न विचारात असल्याने पवारांनी देखील, ‘शिवसेनेसोबत सरकार बनवणार का याचं उत्तर शिवसेनेलाच विचार’, असं म्हणत ते निघून गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून महाशिवआघाडीमध्ये सरकार स्थापण्यावरून चर्चा सुरू असून, पवारांनी असं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात एनसीपी’च्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. त्यामुळे राज्यात पर्यायी सरकार निर्माण झालं पाहिजे, असा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आला. आम्ही राज्यात काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढलो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना काँग्रेससोबत चर्चा केली जाईल, त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं मलिक म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेट्ससाठी आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

एकाच प्रश्नाने कंटाळलेले पवार म्हणाले, ‘सेनेसोबत सरकार बनवणार का ते सेनेलाच विचारा’