मुंबई : आधीच मागच्या हंगामातील दोन ते अडीच लाख टन साखर पडून असताना केंद्रातील मोदीसरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानची साखर अखेर दाखल झाली आहे.

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक तसेच साखर कारखाने संकटात असताना केंद्रातील मोदी सरकारने लाखो मेट्रिक टन साखर पाकिस्तानमधून आयात केली आहे. पाकिस्तान मधून आयात केलेल्या साखरेचा भाव इथल्या बाजार भावापेक्षा १ रुपयाने कमी आहे. मागच्या हंगामातील जवळपास दोन ते अडीच लाख टन साखर पडून आहे आणि यंदा जवळपास ६० ते ६५ लाख टन इतकं अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे.

इथे आधीच इतका प्रचंड साखरेचा साठा पडून असताना केंद्राने पाकिस्तानमधून साखर आयात करण्याची काय गरज होती असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील ऊस उत्पादक तसेच साखर कारखाने संकटात असताना केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे असा स्पष्ट आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नागपूर येथे केला होता.

यंदा झालेले साखरेचे प्रचंड उत्पादन पाहता साखरेचे हे दर आणखी खाली येण्याची दाट शक्यता आहे आणि त्यातच पाकिस्तानची साखर बाजारात दाखल झाल्याने साखरेचे दर आणखी खाली येण्याची शक्यता असल्याने हा प्रयोग म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्या सारखा आहे असा आरोप शेतकरी आणि साखर उत्पादक करत आहेत.

pakistans sugar have enter at navi-mumbai