परभणी : आई-बाबा मी २ दिवसांत गावी येतोय असा शेवटचा संदेश महाराष्ट्राचे वीर सुपुत्र शुभम मुस्तापुरे यांनी कुटुंबियांना दिला होता. परंतु नियतीच्या मनात काही दुसरंच होत. महाराष्ट्राचे वीर सुपुत्र शुभम मुस्तापुरे जम्मू- काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रावर एकच शोककळा पसरली.
आई-बाबा मी २ दिवसांत गावी येतोय असा शेवटचा संदेश त्यांनी कुटुंबियांना दिला होता, परंतु आपल्या मुलाचं पार्थिव तिरंग्यात गुंडाळून येईल असं त्या आई वडिलांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. शहीद शुभम मुस्तापुरें हे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे सुपुत्र आहेत. अवघ्या विसाव्या वर्षी हा महाराष्ट्राचा वीर देशाचं रक्षण करता करता भारत मातेच्या कुशीत सामावून गेला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात शोकाकुळ वातावरण आहे.
महत्वाचं म्हणजे शहीद शुभम मुस्तापुरें यांच्या घराची परिस्थिती खूपच हालाकीची आहे. शहीद शुभम मुस्तापुरें यांचे वडील चाटोरी येथे शिवणकाम करतात तर आई अंगणवाडीत मुलांचा खाऊ तयार करते.
