नवी दिल्ली : ७३ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादावर भाष्य केले. दहशतवाद पोसणाऱ्यांचा भारताकडून पर्दाफाश होत आहे. आज केवळ भारतच नाही तर श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांनाही दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. आम्ही दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढत आहोत.

कलम ३७० बद्दल बोलताना मोदी म्हणाले, अनेकांनी कलम ३७० रद्द करण्यासाठी पाठिंबा दिला. परंतु काही लोक राजकारण करण्यासाठी याला विरोध करत आहेत. कलम ३७०, कलम ३५ ए रद्द केल्याने जर राज्याच भाग्य बदलणार होते, तर गेल्या अनेक वर्षांपासून बहुमत असून ते ताटकळत का ठेवलं. माझ्यासाठी देशाचं हितच सर्वकाही आहे. त्यामुळे ७० वर्षात जे काम झाले नाही ते १० दिवसात केले.

नरेंद्र मोदींनी भाषणात म्हणाले की, आम्ही जीएसटीच्या माध्यमातून एक देश, एक टॅक्स स्वप्न साकार केलं. त्याचप्रकारे मागील काही दिवसांत ऊर्जा क्षेत्रात वन नेशन वन ग्रीड काम यशस्वीरित्या सुरु झालं आहे. वन नेशन, वन मोबिलिटी कार्डची व्यवस्था आम्ही विकसित केली. आज देशात व्यापक रुपाने चर्चा सुरु आहे ती म्हणजे एक देश एक निवडणूक. ही चर्चा व्हायला हवी. लोकशाहीत याची चर्चा होणं गरजेचे आहे.

मागील वर्षभरापूर्वी विधी आयोगाने लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत शिफारश केली होती. यामुळे लोकांचे पैसे वाचविण्यात मदत होईल. याबाबत एक मसूदा कायदे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत देशात एक देश एक निवडणूक घेणं शक्य नाही. केंद्र सरकार याबाबत विचार करत आहे. निती आयोगाने मागील वर्षी एक उपाय सुचविला आहे की, 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी दोन टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाचा वेळ, निवडणुकांवर होणारा खर्चाची बचत होईल. या मुद्द्यावर विचार करण्यासाठी सरकारकडून एका समितीची स्थापनाही करण्यात येणार आहे.

७३ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा