नवी दिल्ली : कालच नवी दिल्लीत मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि त्यात अनेक पक्षातील खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यात भाजप सरकार बहुमताने सत्तेत आल्यामुळे एनडीएच्या घटक पक्षांचे चोचले पुरवले जाणार नाहीत हे त्या घटक पक्षांना आधीच ठाऊक असावं. त्यात मागील ५ वर्ष सत्तेला लाथ मारणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे गोडवे गाताना दिसत आहेत, मात्र त्यांच्याकडे १८ खासदार असले तरी ते मोदींच्या नावावरच निवडून आले आहेत, हे सत्य असलं तरी ते मान्य करणार नाहीत हे वास्तव आहे. अर्थात शिवसेनेचा संपूर्ण प्रचार हा मोदींच्या नावावर झाला, त्यात गरजेप्रमाणे स्वर्गीय. बाळासाहेबांना देखील लक्षात ठेवण्याचा त्रास यांच्या स्टार प्रचारकांनी घेतला नाही हे सर्वांनी डोळ्याने पहिले आहे.
मात्र संपूर्ण देशात एकही खासदार नसताना आरपीआयचे रामदास आठवले यांना एक मंत्रिपद यावेळी देखील निश्चितपणे मिळालं आहे. परंतु दुसऱ्याबाजूला १८ खासदार मिळाल्याच्या आनंदात ‘लाव रे फटाके’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देखील एकाच मंत्रिपद मिळालं आहे. त्यात ठरल्याप्रमाणे ते अवजड उद्योग मंत्रालयच असेल तर अजूनच अवघड आहे, ज्या खात्याचा सामान्यांसाठी काहीच उपयोग नाही. अगदी झालाच तर तर मुंबई आणि आसपासच्या अनेक भागात याच मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारे प्लॉट अनधिकृत वस्त्यांच्या नावाखाली बळकावले आहेत तेथे काही हाती लागण्याची अधिक शक्यता आहे.
मात्र भाजपकडून आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकाच तराजूत तोललं जात आहे हे वास्तव आहे. त्यामुळे रामदास आठवले जसे केवळ भाजप आणि मोदींचे गुणगान गातात तीच वेळ आज उद्धव ठाकरेंची झाली आहे हे वास्तव आहे. त्यामुळे मागील ५ वर्ष भाजप, मोदी आणि अमित शहांवर खालच्या थराला जाऊन टीका करणारे उद्धव ठाकरे सध्या याच नेत्यांवर रामदास आठवले यांच्याप्रमाणे कविता लिहिण्याचेच शिल्लक आहे असंच म्हणावं लागेल.
