मुंबई : ‘युती होगी तो साथी को जितायेंगे, नहीं हुई तो पटक देंगे’, या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लातूर येथे दिलेल्या इशाऱ्यावरून आता शिवसेना-भाजपात शाब्दिक हमरीतुमरीला सुरूवात झाली आहे. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांना उत्तर देताना असल्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचे असे म्हटले आहे.
काल लातूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप सेनेतील युतीवरून शिवसेनेला थेट इशारा दिला होता. अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून प्रत्युत्तर येणार हे गृहीत होते. त्याप्रमाणे शिवसेनेने सुद्धा भाजपावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे आणि चोख प्रतिउत्तर दिले आहे.
संजय राऊत ट्विट करून म्हणाले की, ‘शिवसेना पोकळ धमक्या आणि पाद्रया पावटयांच्या इशारयाना कधीच घाबरली नाही. शिवसेनेचे काळीज वाघाचे आहे. महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. अफजल खान आणि औरंगजेबास आम्हीच “पटकवले” आहे. इतक्या लवकर विसरलात?
लातूर येथे बोलताना शाह यांनी स्वबळाचे स्पष्ट संकेत दिले. ‘युती होगी तो साथी को जितायेंगे नहीं हुई तो पटक देंगे’. मित्रपक्ष सोबत आला तर त्यांना जिंकवू अन्यथा त्यांचाही पराभवाची धुळ चारु. त्यासाठी प्रत्येक बुथवर तयारी सुरु करा, विजय आपलाच होईल, अशा सूचना त्यांनी दिली होती. दरम्यान, दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहता विद्यमान मंत्री, खासदार आणि आमदार मोठ्या राजकीय पेचात सापडले आहेत. लोकसभेत युती न झाल्यास सर्वात मोठा फटका हा शिवसेनेला बसण्याची शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना पोकळ धमक्या आणि पाद्रया पावटयांच्या इशारयाना कधीच घाबरली नाही. शिवसेनेचे काळीज वाघाचे आहे. महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. अफजल खान आणि औरंगजेबास आम्हीच “पटकवले” आहे. इतक्या लवकर विसरलात?
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 7, 2019
