बेळगाव: बेळगातील गोगटे रंगमंदिरात शनिवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी राऊत यांनी काश्मीर प्रश्नावरूनही केंद्र सरकारच्या धोरणावर बोट ठेवले. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती सुधारलेली नाही. तेथील बातम्या बाहेर येत नसल्यामुळे ही गोष्ट इतरांना कळत नाही. मात्र, काश्मीरमध्ये अजूनही बंदुकीच्या बळावर गाडा रेटला जात आहे. देशात सुरु असलेल्या या घडामोडींमुळे, हेच हिंदुत्व असल्याचा अनेकांना वाटू लागले आहे. त्यामुळे मुसलमान सोडा आता हिंदू समाजाचेच काऊन्सिलिंग करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपले काश्मीर म्हणता म्हणता देशाचा एखादा तुकडाच तुटणार नाही ना, असे वाटू लागल्याचे राऊत यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भावडांच्या संबंधावर प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत पण त्यांचं कौटुंबिक नातं अजूनही कायम आहे. दोघांच्या वाटा वेगळ्या असतील, त्यांचे विचार वेगळे असतील, पण त्यांचं नातं कायमचं राहणार आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही.’

आमच्या विचाराचे नसलेल्या लोकांशी आमची मैत्री आहे. राज ठाकरे तर आमचे जवळचे आहेत, अनेक वर्ष त्यांच्यासोबत आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे माझं राज ठाकरे यांच्याशी मैत्रीचं नातं आहे आणि ते आजही टिकलेलं आहे. मैत्री असणे गुन्हा नाही. मात्र मी शिवसैनिक आहे आणि राज ठाकरे त्यांच्या पक्षासाठी काम करतात, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात गेलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी अटक करून आपला महाराष्ट्र द्वेष दाखवला असतानाच शिवसेना नेते संजय राऊत एका कार्यक्रमासाठी बेळगावात दाखल झाले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कर्नाटकमधील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, राऊत यांच्या बेळगाव दौऱ्याने शहरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Web Title:  There is need to council Hindu community in India says Shivsena MP Sanjay Raut.

मुस्लिमांचं राहू द्या, आता हिंदू समाजाचे काऊन्सिलिंग करण्याची वेळ आली आहे: संजय राऊत