नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते आदी बड्या नेत्यांचे भवितव्य आज, मंगळवारी ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. भारतीय जनता पक्षाची फाइट बऱ्याच ठिकाणी काँग्रेसप्रणित आघाडीशी तर काही ठिकाणी माक्सवादी कम्युनिस्ट पक्ष, तसेच प्रादेशिक पक्षांशी असेल.
मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या एकूण १३ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान होणार असून, त्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांचाही समावेश आहे. यात मंत्री गिरीश बापट, सुजय विखे-पाटील, तसेच राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, सुनील तटकरे, स्वाभिमानीचे राजू शेट्टी आदी दिग्गज रिंगणात आहेत. या टप्प्यात १९ महिला उमेदवार रिंगणात असून, सर्वाधिक चार महिला बारामतीतून भाग्य आजमावत आहेत.
पुणे व बारामतीमध्ये प्रत्येकी ३१ उमेदवार आहेत. या टप्प्यासाठी महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अनेक सभा घेतल्या. २0१४ साली या ११७ पैकी ७१ जागा भाजपप्रणित रालोआने जिंकल्या होत्या. त्या कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. गुजरातच्या सर्व २६ व केरळमधील सर्व २० जागांवर एकाच वेळी मतदान होणार आहे. उद्या मतदानामुळे कर्नाटकातील मतदानही पूर्ण होईल. केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी प्रथमच निवडणूक लढवत असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
