नवी दिल्ली: राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा वाढला असून अखेर शिवसेना केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडली आहे. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाशिवआघाडी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अरविंद सावंत यांनी त्यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुपूर्द केला. यावेळी ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही. राज्यात ५०-५० चा फॉर्म्युला करण्याचे ठरले होते. मात्र भारतीय जनता पक्षाने तसे केले नाही. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणूक निकालानंतर दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे मी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देतो आहे असं अरविंद सावंत यांनी सांगितलं आहे. या सगळ्या घडामोडींनंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडली का? असा प्रश्न सावंत यांना विचारण्यात आला. ज्यावर मी राजीनामा दिला आहे त्यातच सगळं आलं असं सूचक वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवलेल्या राजीनाम्याची प्रतही त्यांनी प्रसारमाध्यमांना दाखवली.

अरविंद सावंत यांच्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा