नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ‘दंडा मार’ची भाषा केली तर आम्ही त्यांच्याविरोधात अंडी मारो आंदोलन करु असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. राहुल गांधी अशा प्रकारची वक्तव्यं करत असल्यानेच अमेठीतून ते निवडणूक हरले. राहुल गांधी हे स्वतःच काँग्रेस पक्ष कमकुवत करत आहेत. ते अशाच प्रकारे बोलत राहिले तर काँग्रेस पक्ष संपेल अशीही टीका आठवलेंनी केली.

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीच्या हौझ काझी निवडणुकीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वादग्रस्त विधानावर लोकसभेत शुक्रवारी गदारोळ झाला. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यास आक्षेप घेत संपूर्ण सभागृहाने याचा तीव्र निषेध करावा अशी मागणी केली. राहुल यांच्या विधानाचा सभागृहात उल्लेख होताच कॉंग्रेसचे खासदार संतापले होते.

दरम्यान, हा गदारोळ इतका वाढला की खासदारांमध्ये धक्काबुक्कीही झाली. खरंतर राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चांगलाच समाचार घेतला होता. ”मी ६ महिन्यात सूर्यनमस्कार करुन स्वतःला दंडाप्रुफ करुन घेईन. माझी जनताच माझं संरक्षण कवच आहे” असं उत्तर नरेंद्र मोदींनी दिलं होतं.

नेमकं काय घडलं?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं होतं. त्यात त्यांनी, ‘तरुणांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय, देशाची प्रगती होणार नाही,’ असे सांगताना राहुल यांनी पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरून काल, निवेदन देताना पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले होते. ‘मी माझे सूर्यनमस्कार वाढवेन आणि लाठ्या खाण्यासाठी माझी पाठ मजबूत करून घेईन.’, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत करून, सत्ताधारी बाकांवरून टाळ्या मिळवल्या होत्या. काल पुन्हा याच मुद्द्यावरून सभागृहात काँग्रेस-भाजप सदस्य आमने-सामने आले होते.

त्यात राहुल गांधी यांनी आपल्या भाषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला होता. ते म्हणाले, “ये जो नरेंद्र मोदी भाषण दे रहा है| हिंदुस्तान के युवा इसको ऐसा डंडा मारेंगे की, छह महिनेबाद ये घर से बाहर नहीं निकल पायेगा” आणि यावर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता.

 

Web Title:  Union Minister Ramdas Athawale criticized Rahul Gandhi on his statement about PM Narendra Modi.

यमक जुळणं महत्वाचं? राहुल गांधी मोदींना दंडा मारतील तर आम्ही अंडा मारू: आठवले