पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय मिळाला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत केवळ २ जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाने यावेळी मात्र तब्बल १८ जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना जोरदार राजकीय धक्का दिला आहे. दरम्यान, सर्व जागांवर विजय मिळवण्याची अपेक्षा करणाऱ्या तृणमूल काँग्रेसला केवळ २३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसच्या पारड्यात केवळ १ जागा आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या रणनीतीचा हा परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे. मागील २ वर्षांपासूनच अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयाचे प्रयत्न सुरू केले होते. तसेच भाजपा शाह यांच्या मिशन-२३ च्या जवळ पोहोचली असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच केंद्रात पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असतानाच शाह यांनी पश्चिम बंगालकडेही लक्ष केंद्रित केलं होतं. त्यातच युपीतील सभांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक सभा पश्चिम बंगालमध्ये घेतल्या होत्या. तर अमित शाह यांनीदेखील ११ सभा घेतल्या होत्या. हिंदुत्व आणि घुसखोरीसारखे महत्त्वाचे मुद्दे भाजपाने उचलून धरले होते. तसेच ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जनता नाराज असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
अमित शाह यांनी लोकसभेच्या ५४३ जागांसाठी पक्षाकडून ६०० कार्यकर्त्यांना पूर्णवेळ कामासाठी नियुक्त केले होते. त्यापैकी ५४३ जणांवर लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच ज्या लोकसभेच्या जागांवर भारतीय जनता पक्षाचा जोर नाही अशा जागांसाठी ५-५ सुपरवायझर देखील नियुक्त करण्यात आले होते. तसेच साडेतीन लाख कार्यकर्त्यांनी एकत्रित दीन दयाल विस्तारक योजनेअंतर्गत पक्षाच्या सक्षमीकरणासाठी बूथ लेवलवर काम केले होते. तसेच ४, ००० कार्यकर्त्यांना ६ महिन्यांपासून १ वर्षापर्यंत पूर्ण वेळ वॉलेंटियर्स म्हणूनही काम सोपवण्यात आले होते.
ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची पकड कमजोर होती, अशा १२० पेक्षा अधिक जागांवर शाह यांनी विशेष लक्ष दिले होते. या जागांचा शाह यांनी विशेष आढावा घेतला होता. तसेच त्यांनी केंद्रीय युनिटशी जोडलेल्या १९ विभागांच्या कामांवरही विशेष लक्ष दिले होते. याच शाह’निती’चा फायदा भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये झाला आहे.
