कोलकाता : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली तरी पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्ष विरुद्ध तृणमूल कॉंग्रेस वाद थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत. मागील दोन दिवसांपासून उफळलेल्या वादानंतर भाजपाच्यावतीने वतीने आज बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये १२ तासांचा बंद पुकारण्यात पुकारण्यात आला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून हा दिवस काळा दिवस म्हणून पळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष व टीएमसी कार्यकर्ते यांच्यात हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत.
दरम्यान शनिवारी भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या मुद्यावरून स्थानिक भाजपा नेते व राज्य पोलीसांमध्ये वाद होऊन वातावरण अधिकच गरम झाले. बशीरहाट येथे अंत्यसंस्कारासाठी पक्ष कार्यालयात नेण्यात येणारे भाजपा कार्यकर्त्यांचे मृतदेह मध्येच अडवल्याने रविवारी रात्री संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यातच या दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली.
बंगालच्या २४ परगना येथे शनिवारी सायंकाळी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. ज्यात कथितरित्या आठ जणांचा मृत्यू आणि अनेकजण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. तर तृणमुल काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपाच्या पाच कार्यकर्त्यांची गोळ्या घालुन हत्या केल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आणि १८ जण बेपत्ता असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर तृणमूल कॉंग्रेसच्याही ३ कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसने केला आहे. या घटनेमुळे रविवारीही पश्चिम बंगालमध्ये तणावाचे वातावरण होते.
तसेच वर्षभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप पक्ष येथील वातावरण जातीय तिढ्यात गुंतवून दंगली घडवू इच्छित आहे असा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील परिस्थिती गंभीर असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
