मुंबई : देशातील जनसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे पत्रकार रवीश कुमार यांना सर्वोच्च रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. रवीश कुमार यांच्यासह म्यानमारचे को स्वे विन, थायलँडच्या अंगखाना नीलापजीत आणि फिलिपिन्सचे रेमुंडो पुजांते कैयाब हे यंदा पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

एनडीटीव्हीचे व्यवस्थापकीय संपादक रवीश कुमार यांना यावर्षीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. आशियाचा नोबेल समजला जाणारा हा पुरस्कार मिळणारे रवीश कुमार तिसरे भारतीय पत्रकार ठरणार आहेत. हिंदी वृत्तवाहिनीच्या पत्रकारितेतील योगदानासाठी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच रवीश कुमार यांचा कार्यक्रम ‘प्राइम टाइम’ हा आयुष्यातील खरे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या समस्यांवर नेमकं भाष्य करत असल्याचं रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशनने म्हणले आहे.

जनसामान्यांना भेडसावणारे प्रश्न सातत्याने एनडीटीव्हीच्या ‘प्राइम टाइम’ या कार्यक्रमाद्वारे रवीश मांडतात. वंचितांचे, सोशितांचे , पीडितांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना जाब विचारण्याचे काम रवीश आजही धडाडीनं करत आहेत. ज्यांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहचू शकत नाही अशा अनेकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम रवीश गेली अनेक वर्ष निर्भीडपणे करत असल्यानं त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती पुरस्कार संस्थेनं दिली आहे. विशेष म्हणजे यंदा हा पुरस्कार मिळवणारे ते एकमेव भारतीय आहेत.

‘रवीश कुमार यांची या पुरस्कारासाठी निवड करताना निवड समितीने त्यांच्यातील काही खास गुणांचा गौरव केला आहे. आपल्या कामाप्रती असणारी त्यांची प्रतिबद्धता, उच्च दर्जाची आणि पत्रकारिता करता असणारी नैतिकता, त्यांचे सत्यासोबत उभी राहण्याची हिंमत, सचोटी आणि स्वातंत्र्य भूमिका घेणे हे गुण कौतुकास्पद आहेत. सत्तेला शांतपणे प्रश्न विचारत पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा हा सत्कार आहे’ मॅगसेसेने म्हटले आहे.

पत्रकार रवीश कुमार यांना आंतरराष्ट्रीय ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर