रत्नागिरी : जिल्ह्यात मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जलप्रलय झाला आहे. राजापूर शहरात पाणी भरले असून चिपळुणातील वाशिष्ठी नदीचेपाणी वाढू लागले आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथेही पूर आला आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीत शाळा सोडून देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कहर आजही सुरू असून सायंकाळी चार वाजल्यापासून खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा बंद करावा लागला आहे. त्यामुळे भरणे नाक्यापासून दुतर्फा वाहनांची रांग लागली आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात प्रचंड पाऊस कोसळत असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परंतु खेडमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने पुलाच्या पाण्याच्या पातळी खाली येताच वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पाण्याची पातळी वाढत आहे. शाळा महाविद्यालये सोडून देण्यात आली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात येणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत. व्यापारी व नागरिकांनी सुरक्षितस्थळी सामान हलवले आहे. सोमवारी सकाळ पासूनच पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. त्यामुळे शहरातील जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता शिवाजी पथ, मछीमार्केट, वरची पेठ भागात पुराचे पाणी भरले. पावसाचा जोर अद्यापही कायम असल्यामुळे पाणी वाढत आहे.

राजापुरात पुन्हा पूर, चिपळुणात वाशिष्ठी तर खेड’मध्ये जगबुडी नदीची पातळी वाढली