कणकवली: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज अखेर भारतीय जनता पक्षात विलीन झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे हा विलिनीकरण सोहळा पार पडला. राणे कुटुंबीयांसह स्वाभिमान पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला.
नितेश राणे हे कणकवलीतून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन नारायण राणे यांनी यावेळी केलं. दरम्यान राज्यभरात युती असलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती असली तरीही कणकवलीत मात्र कुस्ती आहे हे दिसून आलं आहे. कारण नितेश राणेंच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला आहे. नारायण राणे पक्षात आलेच होते, राज्यसभेत ते भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत हे मी सगळ्यांना सांगतच होतो. त्यांच्या स्वाभिमान संघटनेचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विलिनीकरणाची घोषणा करताना नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी नारायण राणे म्हणाले की, ”गेल्या काही काळापासून पक्षप्रवेशाबाबत विचारणा होत होती. अखेर आज त्या प्रश्नाचं उत्तर बोलता मिळालं आहे. आज माझ्यासह स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला.
