मुंबई: एकीकडे शिवसेना-भाजप उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाच दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून देखील उमेदवारांची घोषणा केली जात आहे. मात्र, या सगळ्यामध्ये राणे कुटुंबीय कुठेच नव्हते. नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या. खुद्द राणेंनी देखील ‘मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, मुख्यमंत्री तारीख जाहीर करतील’, अशी वक्तव्य केली जात होती. भाजपकडून मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केली जात नव्हती. या सगळ्या पार्श्वभूमीवर सेना-भाजपच्या याद्या जाहीर होत असताना राणेंकडून कोणतंही वक्तव्य केलं जात नव्हतं. मात्र, नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांच्या एका ट्वीटमुळे नारायण राणेंचा भाजप प्रवेश नक्की होणार का? आणि झाला तर कधी? याविषयी संभ्रम कायम आहे.
नितेश राणे हे कणकवलीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या चर्चा आहे. तसंच त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून ते भाजपाकडून निवडणूक लढवतील अशाही चर्चा आहेत. अशातच नितेश राणे यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या नारायण राणे यांचा भाजपाप्रवेश प्रलंबित आहे.
तसंच ४ ऑक्टोबर रोजी ते आपला अर्ज दाखल करतील असंही म्हटलं जात आहे. अशातच ‘काही तास बाकी, वादळापूर्वीची शांतता’ अशा आशयाचं सूचक ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. आपण लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असून पक्षही विलिन करणार असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. परंतु त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी अद्यापही मुहुर्त सापडत नाहीये. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी ते भाजपामध्ये प्रवेश करतील अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या.
— nitesh rane (@NiteshNRane) October 1, 2019
सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे असं एक समीकरणच कोकणच्या राजकारणात झालं होतं. ३४ वर्षं शिवसेनेत राहिलेल्या आणि मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, मंत्री अशी महत्त्वाची पदं मिळालेल्या नारायण राणेंनी २००५ साली शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत राणेंनी शिवसेनेच्या परशुराम उपरकरांचं डिपॉझिट जप्त करुन दाखवलं.
