कणकवली : आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. स्वतःच्या अडाणीपणामुळे कुप्रसिद्ध असलेले रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी आपला अडाणीपणा मागील पानावरुन पुढे चालू केल्याचे समोर आले आहे. संपूर्ण राज्यात सुरु असलेली BSNLची ४ जी सेवा सिंधुदुर्गात आणण्यात अपयशी ठरल्यानंतर आता राऊत यांनी आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोड्ड्ण्यास सुरुवात केली आहे. ही सेवा सुरु झाल्यास नागरिकांचे जुने मोबाईल फोन निकामी होतील व त्यांना नवीन फोन विकत घ्यावे लागतील, अशी अजब कारणं पुढे रेटली आहेत. त्यांच्या या “थोर” विचारांमुळे कोकणात युवापिढी राऊत यांना लाखोल्या वाहत आहे.

सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. जग झपाट्याने ५ जीच्या दिशेने वाटचाल करत आहे. परंतु निधी नसल्याचे कारण देत बीएसएनएलने सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४ जी सेवेतून पूर्णतः वगळले आहे. इतर जिल्ह्यात मात्र ही सेवा सुरु करण्यात आली आहे. इंटरनेटचा वेग ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढीची आस आहे. ती पूर्ण करणे दूरच, या योजनेसाठी सरकारदरबारी पाठपुरावा करण्याचे सोडून जिल्हावासीयांना उलट खिजवण्याचे काम खासदार राऊत यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यात ९०% अधिक लोक २जी व ३जी नेटवर्क असणारे मोबाईल वापरतात. ४जी सेवा सुरु झाल्यास नागरिकांचे जुने मोबाईल फोन निकामी होतील व त्यांना नवीन फोन विकत घ्यावे लागतील, असा अजब दावा राऊत यांनी केला आहे. वास्तविक, दोन्ही जिल्ह्यात मिळून जवळपास ६०% नागरिक हे स्मार्टफोन वापरतात. तसेच बीएसएनएलची ४जी सेवा सुरु झाल्यास त्याचा कोणताही परिणाम संबंधित जुन्या ग्राहकांवर होणार नाही, ज्या नागरिकांकडे २जी व ३जी नेटवर्क चे फोन आहेत ते सुरूच राहतील. तसेच नेटवर्क सिग्नल अजून मजबूत होईल आणि अचानक कॅlल कट होणे वगैरे प्रकार कमी होतील, ही वस्तुस्थिती आहे.

BSNLने सिंधुदुर्गला ४-जी सेवेतून वगळले; अपयशी ठरताच विनायक राऊतांकडून भलतीच अफवा