मुंबई: राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम असून राज्यपाल कोश्यारी यांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. भारतीय जनता पक्षाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून शिवसेनेने पुन्हा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. आज काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतो यावर सगळी गणितं अवलंबून असून आजचा दिवस निर्णायक मानला जात आहे.

भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही राज्यात सत्तेचा दावा करण्यात अपयश आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी तसं पत्रंच केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलं आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याची घोषणा केली जाऊ शकते.

राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केलं. अजित पवार यांनीही मार्गदर्शन यांनी केलं आहे. शरद पवारांना आम्ही सर्वाधिकार दिले आहेत. असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. एक समिती गठीत होईल. समिती आणि शरद पवार यांची सरकार स्थापनेबाबत चर्चा होणार आहे.

दिल्लीहून काँग्रेसचं शिष्टमंडळ येेईल. आमच्याकडे आजच्या घडीला बहुमत नाही हे स्पष्ट आहे. काँग्रेसला सोबत घेऊनच पुढचा निर्णय घेऊ आणि शिवसेनेलाही सोबत घेऊ कारण तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार होऊ शकत नाही. अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे यांची वाट पाहतो आहोत. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही बैठक होईल असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

तत्पूर्वी, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी सोनिया गांधींचे निकटवर्तीय अहमद पटेल, के. सी वेणुगोपाळ आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. आज सकाळी शरद पवार यांची सोनिया गांधी यांच्यासोबत फोनवरुन चर्चा झाली असल्याची माहिती के. सी वेणुगोपाळ यांनी दिली.

दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी सत्ता स्थापनेसंबंधी महत्वपूर्ण विधान केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूकपूर्व आघाडी झाली होती. आमची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर चर्चा सुरु आहे. आम्ही अंतिम निर्णय एकमताने घेऊ. राष्ट्रवादी बरोबर चर्चा झाल्यानंतरच पुढची भूमिका जाहीर करु असे मल्लिकार्जून खर्गे म्हणाले.

सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याचं उघड झालं असतानाच, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फोनवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी आज सकाळी चर्चा केली. पुढील चर्चेसाठी सोनिया गांधी यांनी अहमद पटेल, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि माझी नेमणूक केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाळ यांनी दिली. आता हे तिघेही मुंबईला रवाना होणार आहेत. ते शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळं राज्यातील सत्तापेच सुटणार का? याबाबत उत्सुकता आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळाची मजुरी; कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट जाहीर होण्याची शक्यता?